Sunday 5 February 2017

पुन्हा एकदा .... नवी सुरुवात

तब्बल ३ वर्षानंतर मी आज पुन्हा काहीतरी लिहितोय . हे लिहावंसं वाटण खूप खास आहे . कारण ३ वर्षात आयुष्यात अनेक सारे बदल घडले "कुछ पाया कुछ खोया". तीन वर्षात इथे न लिहिण्याची अनेक कारणे होती पण आता असं काय घडलं ज्यामुळे मला इथे पुन्हा लिहावंसं वाटलं ?? 

मी ब्लॉग सुरु केला ह्याचा मुख्य कारणच मला कुणीतरी नोटीस करावं माझं लिखाण किंवा विचार मला हवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत असंच काहीस होत . आता हे चूक कि बरोबर हे नाही माहित आणि त्यावर जास्त विचार करण्याची सुद्धा जास्त इच्छा नाही .हळूहळू मग तो उत्साह कमी होत गेला आणि इथे येणं, लिखाण करणे बंद झाले . मधल्या काळात मी सोशल मीडिया वर अनेक ठिकाणी खूप वाचत होतो , पण तिथे स्वतः लिहावं असं वाटत नव्हतं. कारण सुरुवातीचे काही प्रयत्न मनासारखे झाले नाहीत .

परंतु काही महिन्यापूर्वी माझ्या पत्नीने मला फेसबुक वरच्या एका समूहावर वर जॉईन होण्यास सुचवलं . तिथेही मी नेहमी सारखा वाचकच होतो परंतु समूहाची एक वेगळी अट होती . प्रत्येकाने काहीतरी लिहीत राहायला हवं किंवा व्यक्त व्हायला हवं नाहीतर समूहातून नारळ दिला जाईल . त्यामुळे मी लिहिण्यास सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात मी तिथे नेहमी लिहायला लागलो . प्रतिसाद सुरुवातीला नाही मिळत असला तरी नकारात्मक प्रतिक्रिया नाही आल्या . त्यामुळे मला नेहमी नवीन लिहिण्याची चटक लागली . मिळेल त्या फावल्या वेळेत मी लिखाणाबद्दल विचार करू लागलो . लिखाणाचा दर्जा कितपत होता हे माहित नाही पण मी सुचेल ते लिहीत होतो .
माझ्या दिवसभरातल्या गंमतीदार घटना , पूर्वीचे किस्से , लेकीचे किस्से , शनिवार रविवारचे नवीन पदार्थ बनवण्याचे प्रयत्न मी शेअर करत होतो . परंतु काही कारणामुळे तो समूह बंद करावा लागला . माझ्यासाठी खरंच एक धक्का होता . कारण आता कुठे पुन्हा एकदा सुरुवात झाली होती आणि असं अचानक समोर आलं कि काही क्षण सुचलंच नाही . माझं लिखाण पुन्हा बंद पडेल असं वाटलं पण एक सकारात्मक  विचार केला. मी पुन्हा लिहून व्यक्त होणे हि त्या समूहाची देणं होती . तो समूह आज जरी नसेल तरी त्याने मला एका आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला होता . मी लिहिण्यास पुन्हा सुरुवात करण्यासाठीच सार काही घडलं असं वाटलं .
किनाऱ्यावर चालताना क्षणभर लाटांचा स्पर्श तुम्हाला होऊन जातो पण त्या लाटेतच त्या महासागराचे अस्तित्व असतं  . तसंच काही माणसे , काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप कमी कालावधीसाठी येतात आणि आयुष्यभर पुरेल असं काहीतरी देऊन जातात .
मी सुद्धा सार काही त्याच अर्थाने समजून घेऊन पुढे जाण्याचं ठरवलं आहे . बघूया किती जमेल , कस घडेल ..

तो समूह एका व्यक्तीसाठी कुटुंब होता आणि आम्हा सर्वासाठी कुटुंब होता. आता मी त्या कुटुंबाबद्दल जास्त काही लिहू शकत नाही पण वेळ आली कि नक्की लिहेन !!!

1 comment:

  1. Well expressed...May ur thoughts are changed by dis time:)

    ReplyDelete