Friday, 28 September 2012

वेडी मीरा


तुझ्या प्रीतीत रंग भरावे मी
तुझी वेडी मीरा ठरावे मी

खेळ आयुष्याचा जिंकता जिंकता
तुझ्यासोबत एकदा हरावे मी

परतून येशील ना रे आता
किती आठवणीत झुरावे मी

निसटुनी जाती रेशीमबंध सारे
हृदयाशी त्यांना घट्ट धरावे मी

पुरे झाले आता दु:खाचे निखारे
तुझ्यासाठीच ह्या जगी उरावे मी.........

यशवंत

Thursday, 6 September 2012

त्रिकोणी चौकट...... ( भाग - 3 )


त्रिकोणी चौकट......
त्रिकोणी चौकट...... ( भाग - २ )


          अचानक जोराने वाजलेल्या हॉर्नमुळे विवेक भानावर आला. आपण आयुष्याची पानं पालटून खूप मागे गेलो होतो हे त्याच्या ध्यानात आलं. घड्याळात पाहिलं तर एक वाजून गेला होता आणि रस्त्यावरची वाहतूक काही कमी झाली नव्हती. आजकाल त्याच्या मनाच सुद्धा तसाच झाल होत.. अनेक सारे विचार त्याच्या मनात रेंगाळत असायचे. सोनिया, परी, ऑफिस आणि अर्पिता..
       अर्पिताचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला त्यादिवशी भेटायला आलेली अर्पिता आठवली. काहीही करून विवेकला मिळवायचं असच ती त्यादिवशी ठरवून आली होती. सार काही मनात मांडून ती विवेक समोर उभी होती. बाकी होत ते फक्त विवेकला सांगायचं. हळू हळू अर्पिताने सार काही विवेकला सांगायला सुरुवात केली.अर्पिताच्या मनातले सारे विचार ऐकून विवेकला धक्का बसला होता. विवेक सोनियासोबत जी स्वप्न पाहत होता त्यात अर्पिताची जागा कुठेच नव्हती आणि विवेकने सुद्धा क्षणार्धात अर्पिताला नकार दिला. त्यानंतर निघून गेलेली अर्पिता अनेक वर्ष सोनिया आणि विवेकच्या संपर्कात आलीच नाही...दिवसामागून दिवस गेले विवेकने सोनियाला त्याच्या प्रेमाची कबुली दिली त्यानंतर घरातल्याच विरोध असूनही दोघांनी लग्न केल.. दोघांचा संसार फुलू लागला होता.. काही वर्षानंतर सोनियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सार काही एखाद्या चित्रपटातल्या गोष्टीसारख सुरळीतपणे चालू होत...
         त्यांच्या त्या संसाराला कुणाची नजर लागली काय माहित.. ऑफिस वरून येताना परीला पाळणाघरातून घेऊन जायचं हा सोनियाचा दिनक्रम ठरलेला होता.ऑफिस वरून निघायच्या आधी सोनियाने विवेकला फोन केल..
"हेल्लो, मी निघाली आहे .."
"एवढ्या लवकर निघालीस ..आजकाल काम कमी आहे वाटत..!! " विवेक सहजच चिडवण्यासाठी बोलला...
"हो तुला काय माहीत माझी काम.. तू तर आपल ऑफिसच काम घेऊन बसतोस दिवसभर. "
"हो का राणीसरकार.. "
"आता काही लाडीगोडी लावायची गरज नाही आहे "
मी फक्त एवढंच सांगायला फोने केला कि मी निघत आहे ..जाताना परीला घेऊन जाईन तू पण निघ लवकर उशीर करू नकोस .."
"हो ग, निघेन लवकर तू ..सांभाळून जा .."
"बाय ."
"बाय ."
विवेकने फोन ठेवला आणि तो स्वतच्या कामाला लागला. बाईसाहेबांचा परत फोन येईलच, परी भेटल्यावर ..तेव्हा बोलूच .. असा विचार करून तो कॉफी आणण्यासाठी गेला.
कॉफी पीत पीत त्याने कामाला सुरुवात केली परत एकदा..  पण आज त्याच तसं लक्ष लागत नव्हत कामात.. पण हे presentation काहीही करून दोन दिवसात client ला द्यायचच होत.
थोड्या वेळाने त्याच्या मोबाईलची रिंग वाजली आणि  त्याने नंबर पाहिला तर अनोळखी होता. संध्याकाळी अनोळखी नंबर वरून कोण बर फोन करत असेल असा विचार करतच त्याने उचलला.
"हेल्लो,  विवेक?? "
"हां बोला,  कोण बोलत आहे? "
"मी आरती, परीच्या पाळणाघरातून बोलत आहे ..तुम्ही जरा इथे याल का? "
"मी???? " "का? काय झाल? आणि असाही सोनिया येतच आहे परीला न्यायला तिकडे ! "
"पण तुम्ही इथे येन गरजेच आहे ..."
"हो पण काय झाल ते तरी सांगाल का ???"
"तुम्ही इथे या मगच मी तुम्हाला सांगू शकते. "
आता काय झालं ह्या बाईला कि मला फोन करून बोलावत आहे. सोनियाला फोन करून बघू ती काय बोलते मग ठरवू जायचं कि नाही.विवेकने सोनियाला फोन केला पण सोनिया फोनच उचलत नव्हती. ठीक आहे बघू काय झाल असेल.. नाहीतर एवढ्या तातडीने आपल्याला बोलावणार नाहीत...काम बघू उद्या सकाळी येऊन करू...
परीला काही बर वाईट तर झाल नसेल ना ..शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकली पण असा वाईट विचार आपण का करत आहे असे बोलून विवेक सरळ परीच्या पाळणाघराच्या दिशेने निघाला ....

क्रमश.... 

Sunday, 6 May 2012

त्रिकोणी चौकट...... ( भाग - २ )

        
          विवेकला सार काही आठवत होत जणू सार काही कालच घडल्यासारख ... सोनिया त्याच्या कॉलेजच्या ग्रूप मधली दिसायला एकदम सुंदर नाही पण थोडी सावळी, बोलक्या डोळ्यांची , चाफेकळी नाकाची, नेहमी हसत राहणारी आणि सतत आपली बडबड करत राहणारी. तिचे विस्कटलेले केस तर तिच्या ह्या साऱ्यामध्ये भरच घालत होते.. विवेकला ती काही पहिलाच दिवशी नाही आवडली पण ग्रूप मध्ये जसा जसा तो  रमू लागला तसा  सोनिया मध्ये पण रमू लागला होता. अनेक वेळा कॉलेज मध्ये येण्याचा मूड नसेल तरी तो फक्त सोनिया आपल्या सोबत असेल ह्या विचारानेच कॉलेजला यायचा. सोनियाच मात्र वेगळाच होत तिला विवेक म्हणजे कॉलेज मधला एक मित्रच मानत होती ह्यापलीकडे मात्र तिने कधी विचार केलाही नव्हता. कारण सोनिया साठी सगळ्यात जास्त महत्वाच होत  ते  म्हणजे तीच करीअर .. विवेक सोनिया मध्ये गुंतत चालला होता हे हळू हळू सोनियालाहि कळू लागल होत तिची ह्या साऱ्यामध्ये फार घुसमट होत होती कारण तिलाही विवेक बद्दल थोड फार का होईना पण आकर्षण वाटू लागले होते पण आपल्या करीअर च्या मध्ये तिला ह्या सगळ्या गोष्टी नको होत्या. ....
 
          अर्पिता सोनियाची एकदम जीवाभावाची मैत्रीण ती सुद्धा त्यांचाच ग्रूप मध्ये होती आणि तिचा जीव मात्र विवेक मध्ये अडकला होता . विवेकला तर ह्या साऱ्याची काही कल्पनाच नव्हती. विवेकच ते राजबिंड रूप, स्मार्टनेस ह्या सगळ्यावर अर्पिता भाळून गेली होती आणि अर्पिता सुद्धा दिसावयास खूप सुंदर आणि स्मार्ट होती. पण सोनिया पुढे त्याला मात्र काहीच दिसत नव्हत . सोनियाने ह्या साऱ्यामध्ये आपल्या मनाचे ऐकायचे ठरवले आणि तिने सुद्धा आयुष्यभर विवेक सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि तिने हि गोष्ट पहिल्यांदा सांगितली ती म्हणजे अर्पिताला आणि हे सार एकटाच अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकली ...
आणि हे सार विवेक ला सांगायची जबाबदारी सोनियाने अर्पिताला दिली कारण हे सर्व जाऊन विवेक ला सांगायचं धाडस सोनिया कडून होत नव्हत.
 
          अर्पिताने जेव्हा हे सार एकल तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिला कळत नव्हत. स्वताच स्वप्न डोळ्यासमोर उद्धवस्त होताना ती बघत होती आणि तिच्या मनावर तिचा ताबा नव्हता राहिला. तिने ठरवलं कि काही झाल तरी विवेक ला आपण मिळवायचं हाच विचार ती करू लागली. विवेकला भेटायला जाण्यासाठी   ती निघाली पण मनांत काही वेगळच ठरवून ...................
 
क्रमश....

Monday, 16 January 2012

त्रिकोणी चौकट......

      जोराने दार बंद करुन विवेक लॉंबीमधे आला. लिफ्टच बटन दाबल आणि अस्वस्थपणे लिफ्टची वाट पाहत होता.लिफ्टच्या इंडिकेटरवरचे आकडे बदलत होते १,२ ३ ..... पण २२ व्या मजल्यावर लिफ्ट यायला अजून वेळ लागला असता. तो तसाच स्टेप्सवरून  खाली धावत निघाला. खिशे चाचपले आणि गाडीची चावी काढून निघाला. बिल्डिंगच्या गेट जवळ येऊन जोरात गाडीचा हॉर्न वाजवून त्याने आणि त्या शांत मध्यरात्री गाढ झोपी गेलेल्या अनेकांची झोपमोड केली. वॉंचमेनने घाई घाई मध्येच सलाम करून बिल्डींगचा गेट उघडला आणि मनातल्या मनात विवेकला शिव्याहि दिल्या. एवढ्या मध्यरात्री कुठे निघाला आहे हा असा विचार करतच वॉंचमेन आपल्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

      विवेक गेटच्या बाहेर येऊन मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाला . कुठे जायचा आता हा प्रश्न त्याच्या मनात होता. कुठेतरी लांब जाव एवढंच त्याला ह्या क्षणी वाटत होत.

      पेट्रोल पंप च्या दिशेने वळून थोडस पेट्रोल गाडीत टाकून तो मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जोराने गाडी पळवत होता मधेच मागे वळूनही बघत होता. कुणी आपला पाठलाग तर नाही ना करत आहे हीच भीती त्याला सारखी सतावत होती. गाडी वाऱ्याच्या वेगाने पळत होती तसा त्याला  थोडासा गारठा जाणवू लागला होता.

      गाडी जशी जशी पुण्याच्या दिशेने पळत होती तस तस त्याच मन मागे जाऊ लागल खूप साऱ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर rewind होऊ लागल्या.परी, त्याच आणि सोनियाच लग्न, आई बाबांचा विरोध,नोकरी मधला struggle ,कॉलेजचे दिवस, मित्र, सोनिया आणि त्याच प्रेम,...खूप मागे चालला होता विवेक. कडू-गोड साऱ्या आठवणी  ह्या क्षणाला त्याच्या मनात एकमेकांशी जणू काही स्पर्धाच करत होत्या.....

क्रमश....

Tuesday, 3 January 2012

सौंदर्य शोधण्याची कला....

     गेले काही महिने मी सुरेश पेठे काकांची चित्रे, सुहास आणि पंकजची फोटोग्राफी, क्रांतीताईच्या  गझल आणि कविता , अनघाताई आणि महेंद्र काकांचे ब्लॉगवरचे पोस्ट ह्या सर्व गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेत होतो. त्यासोबतच मनातच आपणही अस काही कराव अस नेहमी वाटत होत. प्रत्येकाची हि एक कला होती आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृती मध्ये एक सौंदर्य भरलेले होते. नेहमी अस वाटत होत हे सौंदर्य देवाने त्यांनाच  दिल आहे अस आपल्याला नाही जमू शकणार.  मनात हे एकदम घर करून गेल होत.

     हळूहळू ह्या सर्वांच्या कलाकृतीचा प्रभाव मनावर पडत गेला आणि मनातले नकारात्मक विचार बदलू लागले. प्रत्येकाकडे देवाने एकच कला दिली होती ती म्हणजे आयुष्यातलं सौंदर्य शोधण्याची. उगाचच नाही हि मंडळी सर्व सामन्याप्रमाणेच रोजच्या धावपळीतून हे सर्व लोकांपर्यंत पोहचवत होते.

     सुरेश काकांची चित्रे म्हणजे त्याच्या सभोवतालच्या परिसरातलीच होती जी त्यांनी त्यांच्या रंगातून आपल्यासमोर आणली. सुहास आणि पंकजला तर ती नजर मिळाली होती जी कॅमेरा पलीकडली आहे पण सारी छायाचित्र तुम्हा आम्हा सर्वांच्या रोजच्या आयुष्यातालीच होती. क्रांतीताईच्या  गझल आणि कवितांनी आयुष्यातले अनेक सारे भाव हळुवारपणे उलगडलेले आहेत. अनघाताई आणि महेंद्र काकांच्या  पोस्ट मध्ये तर रोजच्या रुटीन प्रसंगातले  अनेक सारे पैलू बघायला मिळतात. खरच ह्या सर्वांनी आयुष्यातलं सौंदर्य शोधण्याची कला जोपासली आहे आणि त्यामुळेच आपल्याच सर्व सुंदर पाहायला आणि वाचायला मिळत आहे.

   मी आता देवाकडे एकच गोष्ट मागेन कि आता मला माझ्या आयुष्यात सौंदर्य नको आहे तर आयुष्यात जे काही आहे त्यातलं सौंदर्य शोधण्याची कला माझ्याही अंगी जोपासली जावी ....



Friday, 30 December 2011

हिशोब


चला आता वेळ आली आहे निरोप घेण्याची.. अहो तुमचा निरोप नाही तर ह्या सरत्या वर्षाचा . तुमच्या सोबत तर कायम राहायचं आहे.

 एक वर्ष संपल आणि दुसर वर्ष नवीन संधी घेऊन दारात उभ आहे .त्याच स्वागत तर करायला हव पण त्याअगोदर सरत्या वर्षाचा हिशोब एकदा मांडायला हवा.
हिशोब म्हणजे पैशाचा नाही कारण आजवर तो हिशोब कधी जमलाच नाही. गेल्या वर्षात किती कमावलं आणि किती गमावलं , किती सुख उपभोगल आणि किती दुख सहन केल ,किती माणस जोडली आणि किती माणस तुटली , ह्याचा ताळेबंद तर मांडायलाच हवा.

मागे वळून पाहिल तेव्हा हे वर्ष तस सुख देऊनच गेल, वैयक्तिक प्रगतीच झाली  पण काही आशा अजूनही मनात तशाच राहिल्या आहेत. मनाने सुद्धा अनेकदा निराशेचे सूर गायले परंतु सभोवतालच्या माणसांमुळे लढायची जिद्द अजून आहे.

वर्षभरात मनाला आनंद आणि समाधान मिळवून देणाऱ्या गोष्टी घडून आल्या. काही कविता रचल्या गेल्या , चित्रकलेमध्ये पुन्हा एकदा मन रमु लागल ,छायाचित्रणाची गोडी लागली , ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली . नव्याने जोडल्या गेलेल्या मित्र-मंडळीमुळे आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे सर्व काही घडून आल.

हिशोब पहिला तर जमेच्याच बाजू आहेत सगळ्या पण मनात राहिलेल्या अपूर्ण इच्छाच काय करणार ?? हा प्रश्न सारखा मनाला टोचत आहे. निराशा एखाद्या सुनामीसारखी येते आणि क्षणात स्वप्नाचे सारे बंगले पाण्यात उद्धवस्त करून जाते . वर्ष संपल तर ह्या अपूर्ण इच्छा मागे ठेवून पुढे जायचं का?? नाही अस नाही.. तर पुढल्या वर्षात पूर्ण करण्यासाठी त्यांना पण सोबत घेऊन जायच. जगण्याची लढाई अशीच चालू ठेवायची आहे.

वर्षभरात तुम्ही जो काही प्रतिसाद दिला आणि मार्गदर्शन केल त्याबद्धल मी तुमचे आभार मानतो आणि पुढील वर्ष तुम्हा सर्वाना सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Thursday, 22 December 2011

आयुष्याची समीकरणे


सोडवत आहे एकरेषीय समीकरणे
प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष
स्थापिला बिंदू स्वःतचा
सोबतिला जरी असतिल अनेक

                                         बिंदूमधील अंतरे नात्याची
                                         काही जवळ तर काही दूरची
                                         निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे
                                         सुखदु:खाच्या अक्षांना छेदती

गवसतील तेव्हा रेषांना
कधी कोन काटकोन त्रिकोण
आणि बदलून जाईल नशीब
मिळेल जेव्हा नवी दिशा नवा दृष्टीकोन

                                        बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे
                                        कधी पुढे-मागे कधी वरती-खालती
                                       असेच करता करता सुटतील समीकरणे
                                       उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती...

यशवंत....