Sunday 19 November 2017

बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा

     बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे  आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत . संजय मिश्रा असेच गेली अनेक वर्षे सिनेमा क्षेत्रात असून सुद्धा लोकांना आठवत नसेल पण गेली २-३ वर्षे संजय यांनी एक हाती सांभाळलेले सिनेमे वाखाणण्याजोगे आहेत .बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली गेली हे आकडे फुगवून सांगता येतील पण करोडो लोकांच्या मनात स्थान निर्माण करण खूप जिकरीचे काम आहे . प्रत्येकवेळी आपल्या कामाने लोकांच्या अपेक्षा उंचावत जाणे हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती असते .
संजयचा जन्म ६ऑक्टोबर १९६३ साली झाला. त्याचे बरेचसे बालपण बनारस मध्ये गेले . त्याच्या घरात सरकारी नोकरीचा वारसा होता . त्याचे आजोबा जिल्हा दंडाधिकारी आणि वडील माहिती आणि दूरसंचार विभागात कार्यरत होते संजयची आजी पटना रेडिओ स्टेशन वर गाणे गात असे आणि तिचाच जास्त प्रभाव संजयवर पडला . संजयच्या वडलांना सुद्धा कलासाहित्यामध्ये रुची होती आणि त्यानिमित्त घरी होणाऱ्या मैफिलींमुळेच आपणही ह्यात काहीतरी करावे असे संजयला वाटू लागले. दहावीच्या परीक्षेत संजय दोन वेळा नापास झाला. त्यानंतर त्याने NSD बद्दल ऐकलं आणि त्यामध्ये प्रयत्न करायचे ठरवले . NSD मध्ये शेवटच्या वर्षाला असताना इरफान खान आणि संजय दोघेही एकत्र होते . 
    १९९१ मध्ये मुंबईमध्ये आल्यावर त्याला कुणी अभिनेता म्हणून घेतील असे त्याला वाटत नव्हते म्हणून कॉमेडियन ,खलनायक असे रोल करायला सुद्धा तो तयार होता पण त्यापैकी एकही रोल त्याच्या पदरात पडत नव्हता . त्यामुळे त्याने पडद्यामागच्या अनेक साऱ्या भूमिका केल्या कॅमेरा ते कला दिग्दर्शन ह्या सगळ्यामध्ये त्याने काम केले . काही दिवस वडापाव खाऊन तो राहिला हि गोष्ट तो अनेकदा अभिमानाने सांगतो . घराची आठवण आली कि अंधेरी स्टेशनवर जाऊन राजधानी एक्सप्रेसला पाहून रडत असे . त्यावेळी त्याचे आईवडील दिल्लीमध्ये स्थायिक होते .उमेदीच्या काळात अनुभवाने तो खूप काही शिकत गेला आणि हाच सारा अनुभव त्याला त्याच्या सगळ्यात उत्तम अशा "आँखो देखी " सिनेमा मध्ये कामी आला .१९९१ मध्ये आलेली चाणक्य मालिका त्याच पडद्यावरच पाहिलंच काम होते . पहिल्या सीनसाठीच त्याने २८ टेक घेतले .तो एखादी स्क्रिप्ट खूप खोलात जाऊन वाचत असे आणि त्यामुळेच त्याच्या मनात असलेला चाणक्य मधला रोल आणि दिग्दर्शकाच्या मनातला रोल ह्यात खूप सारी तफावत होती . त्यानंतर स्क्रिप्ट वाचणे त्याने थांबवून जे काही दिग्दर्शक सांगेल ते करण्याचे ठरवले .

     ऑफिस ऑफिस सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी संजयला पोटदुखीचा त्रास आणि त्याला दाखल करावं लागलं . १५ लिटर पाणी त्याच्या पोटामधून काढण्यात आलं आणि ह्यावेळी त्याच्या वडिलांनी खूप साथ दिली . रोज त्याचे वडील त्याच्या सोबत फिरायला जात . ह्याच दरम्यान पाटणा हॉस्पिटलचे डीन संजयकडे आले आणि त्याच्या पत्नीला संजयला भेटायचे आहे असे सांगितले .संजय त्याची स्थिती नसतानासुध्दा त्यांना भेटायला गेला . त्यांनी संजय बघून एक हास्य दिले . त्या मृत्यूच्या दारात उभ्या होत्या . एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दारात उभं असताना आपल्याला भेटावसं वाटणं हे ऑस्करपेक्षा मोठी गोष्ट आहे असं संजयला वाटत होत .त्यानंतर संजयच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्या नंतरच्या दुःखात तो पूर्णपणे कोलमडून गेला होता .त्यानंतर मुंबईला जाण्याऐवजी ऋषिकेशला निघून गेला . तिथे एका धाब्यावर तो ऑम्लेट बनवण्याचं काम करत होता .तिथल्या सरदार मालकाने त्याला ओळखले नाही पण तिथे येणारे ग्राहक त्याला ओळखत आणि त्याच्यासोबत फोटो काढून घेत. 
     रोहीत शेट्टीने त्याला पुन्हा सिनेमामध्ये येण्यास तयार केले आणि "ऑल द बेस्ट "  सिनेमा मध्ये घेतले. NSD मध्ये असताना तुटणाऱ्या नातेसंबंधाबद्दल अनेक कथा ऐकल्यामुळे तो लग्नापासून लांब होता .पण वडिलांच्या मृत्यनंतर आलेल्या एकाकीपणामुळे त्याच्या आईने त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २००९ मध्ये उत्तराखंडच्या किरण सोबत लग्नच्या बेडीत अडकला .जेवण बनवणे संजयला खूप आवडते आणि त्यामुळेच जिथे कुठे शूटिंग असेल तिथे तो गॅस सिलेंडर घेऊन स्वतःचे जेवण स्वतः बनवतो . असे असाल तरी स्वतःच्या दोन मुलींसाठी(पल  ५वर्षे आणि लम्हा २ वर्षे ) तो मात्र जेवण बनवत नाही .कारण त्याच्या दोन्ही मुलींना जॅम रोटी आवडते आणि संजयच्या मते जरी आपल्या मुली असतील तरी सुद्धा तुम्ही बनवलेल्या जेवणाचा आदर राखला गेला पाहिजे .
     "ओह्ह डार्लिंग ये हैं इंडिया " मधून पदार्पण करणाऱ्या संजयने सत्या ,दिल से , बंटी बबली ,गोलमाल ,साथिया ,गुरु ,धमाल,वेलकम सारख्या बिग बजेट मुख्य प्रवाहातल्या सिनेमामध्ये काम केले. तसेच त्याने अनेक सारे सिनेमे फक्त काम करायला मिळतंय ह्या भावनेनं केले आहेत त्यातले अनेक सिनेमे प्रदर्शित सुद्धा झाले नाहीत  . फस्स गये ओबामा ,मसान ,दम लगा के हैशा ,सारे जहाँ से मेहेंगा ,मिस तानाकपुर हाजीर हो , न्यूटन  सारख्या लो बजेट सिनेमातल्या कामाचं समीक्षकांनी नेहमीच कौतुक केलं आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला आँखो देखी हां संजयच्या अभिनयच उत्कृष्ट नमुना आहे . ऑफिस ऑफिस  मालिकेटमधील शुक्लाच पात्र संजयने छान रंगवलं होत .
     संजय नेहमीच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावत आहे आणि त्या अपेक्षांना खरा ठरत आहे . बॉलीवूड च्या चमचमत्या दुनियेत असे तारे त्यांच्या अभिनयक्षमतेने नेहमी झळाळून निघू देत ..
२४ नोव्हेम्बर ,२०१७ रोजी ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा बॉलीवूडमधला पहिलाच सिनेमा  "कडवी हवा"  येत आहे आणि ह्या सिनेमामध्ये संजय मुख्य भूमिकेत आहे.  त्यासाठी संजयला खूप खूप शुभेच्छा !!!! 





Friday 10 February 2017

लढाई इंग्रजीशी


 अनेकदा इंग्लिश सुधारण्यासाठी काय करावं हा प्रश्न विचारला जातो. ह्याचा अर्थ इंग्लिश येत नाही असा नसतो ,आजकाल खूप साऱ्या लोकांना इंग्लिश लिहिता वाचता येत असत पण अडचण येते ती इंग्लिश बोलताना .
काही प्रोफेशनल लोक सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीत इंग्लिश बोलतात पण त्यांना सुद्धा दैनंदिन व्यवहारातील इंग्लिश बोलताना खूप अडचण येते . ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे शब्द संग्रहाची कमी आणि रोजचा सवय नसणे . दोन्ही गोष्टी सहज साध्य करता येण्यासारख्या आहेत.
शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वाचन करणे आणि अडलेला शब्दाचा अर्थ समजावून घेणे गरजेचे आहे. रोज काहींना काहीतरी वाचायचे वर्तमानपत्र वाचा , मासिक वाचा , फेसबुक पोस्ट वाचा पण किती वाचावं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना .. मग रोज नवीन १० शब्दापर्यंत अडत नाही आणि त्याचा अर्थ शोधत नाही तो पर्यंत वाचत राहावं .. एक दिवस असा येईल कि तुम्ही कोणत्याच शब्दाला अडणार नाही . पण नुसता शब्दाचा अर्थ समजावून घेणे पुरेसे आहे का ? तर नाही हे म्हणजे असं झालं कि मशीन गन आहे पण कस वापरायचं माहित नाही .
तर मग काय करावं ?? ज्या शब्दाला तुम्ही समजून घेणार आहे त्याचा वाक्यात कशाप्रकारे वापर केला आहे हे समजून घ्याच .
उदाहरण घ्याच तर "cup of tea " कोणत्या पद्धतीने वापरलं आहे हे समजून घेतलं पाहिजे त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे
Action movies aren't really my cup of tea. I prefer dramas and comedies, to be honest
तर हि झाली दुसरी पायरी म्हणजे मशीन गन आणली, त्याच मॅन्युअल वाचाल कि ती कशी वापरायची पण मैदानात उतरण पण गरजेचे आहे ना ?
त्यासाठी आपण दोन गोष्टी करायच्या. पहिले म्हणजे इंग्लिश ऐकणे आणि त्यासाठी हमखास इंग्लिश सिनेमे पाहण्याचा सल्ला दिला जातो . पण सिनेमे पाहताना त्यात पहिला इंटरेस्ट वाटणे गरजेचे आहे . कारण एक तर अससेन्ट आणि एकंदर इंग्लिश सिनेमाची धाटणी पाहता भारतीय लोक खूप कमी इंग्लिश पाहतात . कारण आपल्याला सवय आहे मेलोड्रॅमिक सिनेमे पाहण्याची . आजकाल आपण वास्तवाशी निगडित सिनेमे पाहतो ..
सिनेमा आला आणि विषयांतर झालं .. असो ..तर मग काय इंग्लिश ऐकावं ?
हो एक पर्याय आहे पण त्यासाठी तुम्हाला लहान व्हावं लागेल...हो हो लहानच व्हावं लागेल कारण त्यासाठी तुम्हाला एक कार्टून पाहावं लागेल . त्या कार्टून सिरीजच नाव आहे "Peppa Pig".
"Peppa Pig" एक ब्रिटिश कार्टून आहे . संपूर्ण कार्टून एक लहान डुक्कर "पेपा" आणि तिच्या कुटुंब आणि मित्रमंडळी वर आधारित आहे. पेपाच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीवर आधारित हे कार्टून आहे . समजायला खूप साधे आणि सोप्पे इंग्लिश जे नेहमी इंटर्स्टिंग वाटते . मी अनेकदा ह्याचे १ तासाचे एपिसोडस लेकी सोबत पहिले आहे . सारे एपिसोडस youtube वर आहेत . ह्यामुळे दैनंदिन जीवनातील इंग्लिश तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याचा सराव सुद्धा होईल .
लहान मुलांना दाखवण्यासाठी जगातलं सगळ्यात उत्तम कार्टून आहे हे असं मी छातीठोकपणे सांगू शकतो .
आता आपली युद्धात उतरण्याची वेळ आली आहे आणि युद्धात तुम्हाला पहिला हल्ला चढवायचा आहे तो तुमच्या घरातल्यांवर , तुमच्या शाळेत जाणाऱ्या लेकरांशी इंग्लिश मध्ये बोला , पार्टनर सोबत गप्पा मारा , कामाच्या ठिकाणे एखाद दोन वाक्याने सुरुवात करा ..पण कुठेही थांबू नका ..बोलत राहा ..
कुणीतरी म्हटलं आहे एकादी गोष्ट २१ दिवस नित्यनियमाने केली कि त्याची सवय लागते म्हणून फक्त २१ दिवसाचा प्रश्न आहे. तो पर्यंत तुम्हाला सुद्धाला आत्मविश्वास येईल आणि इंग्लिशची अडचण कायमची निघून जाईल ...

Sunday 5 February 2017

पुन्हा एकदा .... नवी सुरुवात

तब्बल ३ वर्षानंतर मी आज पुन्हा काहीतरी लिहितोय . हे लिहावंसं वाटण खूप खास आहे . कारण ३ वर्षात आयुष्यात अनेक सारे बदल घडले "कुछ पाया कुछ खोया". तीन वर्षात इथे न लिहिण्याची अनेक कारणे होती पण आता असं काय घडलं ज्यामुळे मला इथे पुन्हा लिहावंसं वाटलं ?? 

मी ब्लॉग सुरु केला ह्याचा मुख्य कारणच मला कुणीतरी नोटीस करावं माझं लिखाण किंवा विचार मला हवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत असंच काहीस होत . आता हे चूक कि बरोबर हे नाही माहित आणि त्यावर जास्त विचार करण्याची सुद्धा जास्त इच्छा नाही .हळूहळू मग तो उत्साह कमी होत गेला आणि इथे येणं, लिखाण करणे बंद झाले . मधल्या काळात मी सोशल मीडिया वर अनेक ठिकाणी खूप वाचत होतो , पण तिथे स्वतः लिहावं असं वाटत नव्हतं. कारण सुरुवातीचे काही प्रयत्न मनासारखे झाले नाहीत .

परंतु काही महिन्यापूर्वी माझ्या पत्नीने मला फेसबुक वरच्या एका समूहावर वर जॉईन होण्यास सुचवलं . तिथेही मी नेहमी सारखा वाचकच होतो परंतु समूहाची एक वेगळी अट होती . प्रत्येकाने काहीतरी लिहीत राहायला हवं किंवा व्यक्त व्हायला हवं नाहीतर समूहातून नारळ दिला जाईल . त्यामुळे मी लिहिण्यास सुरुवात केली आणि थोड्याच दिवसात मी तिथे नेहमी लिहायला लागलो . प्रतिसाद सुरुवातीला नाही मिळत असला तरी नकारात्मक प्रतिक्रिया नाही आल्या . त्यामुळे मला नेहमी नवीन लिहिण्याची चटक लागली . मिळेल त्या फावल्या वेळेत मी लिखाणाबद्दल विचार करू लागलो . लिखाणाचा दर्जा कितपत होता हे माहित नाही पण मी सुचेल ते लिहीत होतो .
माझ्या दिवसभरातल्या गंमतीदार घटना , पूर्वीचे किस्से , लेकीचे किस्से , शनिवार रविवारचे नवीन पदार्थ बनवण्याचे प्रयत्न मी शेअर करत होतो . परंतु काही कारणामुळे तो समूह बंद करावा लागला . माझ्यासाठी खरंच एक धक्का होता . कारण आता कुठे पुन्हा एकदा सुरुवात झाली होती आणि असं अचानक समोर आलं कि काही क्षण सुचलंच नाही . माझं लिखाण पुन्हा बंद पडेल असं वाटलं पण एक सकारात्मक  विचार केला. मी पुन्हा लिहून व्यक्त होणे हि त्या समूहाची देणं होती . तो समूह आज जरी नसेल तरी त्याने मला एका आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला होता . मी लिहिण्यास पुन्हा सुरुवात करण्यासाठीच सार काही घडलं असं वाटलं .
किनाऱ्यावर चालताना क्षणभर लाटांचा स्पर्श तुम्हाला होऊन जातो पण त्या लाटेतच त्या महासागराचे अस्तित्व असतं  . तसंच काही माणसे , काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप कमी कालावधीसाठी येतात आणि आयुष्यभर पुरेल असं काहीतरी देऊन जातात .
मी सुद्धा सार काही त्याच अर्थाने समजून घेऊन पुढे जाण्याचं ठरवलं आहे . बघूया किती जमेल , कस घडेल ..

तो समूह एका व्यक्तीसाठी कुटुंब होता आणि आम्हा सर्वासाठी कुटुंब होता. आता मी त्या कुटुंबाबद्दल जास्त काही लिहू शकत नाही पण वेळ आली कि नक्की लिहेन !!!

Tuesday 10 June 2014

नियती ...

नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत
समांतर चालत असते . वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत . कधी रणरणत्या
उन्हात वाऱ्याची  झुळूक  मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा
सुटल्यावर घर उध्वस्त  करून जातो . नियती पण रंकाला  राजा बनवते आणि कधी
क्षणात होत्याचे नव्हते करून जाते.
आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं  आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू
असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे
सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या  तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं  जरी असल
तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट  नियतीच्या
खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला  डाव सावरायचा
आणि पुन्हा उभं राहायचं . कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने
नक्कीच पडतील .....

 यशवंत

Saturday 9 March 2013

कुठेतरी दुरवर ...................



कुठेतरी दुरवर जायचं आहे
सावलीची सुद्धा आशा नाही
पाय नेतील तिथवर चालायचं
थांबतील तिथे थांबायचं.........
वाटेत अनोळखी भेटतील
जे जीवलग बनुन जातील
पण जीवलग भेटून सुद्धा कधी
अनोळखी बनुन राहतील.........
रस्त्याच्या कडेला कधी
विसावा म्हणून पडायचं
पुन्हा ऊन वारा सोसत
मात्र एकट्यान घडायचं..........
कुठेतरी दुरवर जाऊन
एखाद्या वळणावर  माग वळून पाहायचं
कितीही दुरवर आलो तरीही
तुझ्या मनात मात्र कायम राहायचं

यशवंत

Wednesday 23 January 2013

मृगजळ- एक आभास

    पूर्वी लहान असताना मृगजळ नावाची कविता बालभारतीच्या पुस्तकात होती. कवीच नाव आणि  कवितेच्या ओळी सुद्धा  आता आठवत नाही आहेत.हा पण मी तेव्हा प्राथमिक शाळेत असेन तेव्हा कधीतरी होती नेमकी इयत्ता नाही सांगता येत. आमच्या बाईंनी खूप छान शिकवलं होत पण सार काही डोक्यावरून गेल होत. आम्हीच कुठे तरी कमी पडलो कारण त्या वयापर्यंत बाई खूप चांगल्या  शिकवायच्या नंतर मात्र हळूहळू शिंग फुटायला लागली.तो भाग तसा वेगळा आहे. खर म्हणजे  वाळवंट आणि त्यात मृगजळाच्या आशेमागे धावणाऱ्या हरणाची कविता होती .आम्ही पडलो मुंबईतले जिथे पावसाची चांगलीच कृपा आहे त्यामुळे वाळवंट आम्हाला फक्त भूगोलाच्या पुस्तकापर्यंतच माहित होत. जिथे वाळवंटच माहित नाही तिथे मृगजळ समजणे थोड अवघड गेल होत.परीक्षेपर्यंत थोडासा पोटापाण्याचा अभ्यास करून आम्ही त्या मृगजळाच्या फेऱ्या मधून बाहेर पडलो होतो.

          परीक्षा देऊन आम्ही पास होत गेलो वरच्या इयत्तेमध्ये गेलो.वयानुसार थोडी आकलनशक्ती सुधारली होती.घरात केबल आली आणि डिस्कवरी चैनल मधून आफ्रीकेमाधली वाळवंट समजले . त्यातच आम्ही  पहिल्यांदा मृगजळ म्हणजे काय आणि ते बिचारे तहानलेले हरण  पाण्याच्या आशेने कसे धावते हे पाहिले . तेव्हा ह्या मृगजळाचा खेळ फक्त पहिला पण समजून नाही घेतला. खेळ खेळणारे तेच पण खेळाचे नियम वेळोवेळी बदलत होते.

          लहानपणी आई-बाबा परीक्षेत चांगल्या नंबरने पास हो मी तुला सायकल आणून देईन सांगायचे आणि आम्ही मग सर जग एकटवून अभ्यासाला लागायचो . पूर्वी जग खूप लहान होत हो त्यामुळे जमून जायचं. आता जग पालथ घालतो पण जग एकटवन नाही जमत. असो .. हा आम्ही मात्र दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचो आणि निकालाची वाट पाहायचो. तो पर्यंत वेगवेगळ्या सायकलची माहिती काढून तयार असायचो.निकालाच्यादिवशी चांगला नंबर मिळाला कि धावत जाऊन बाबांच्या समोर हजर व्हायचो.त्यानंतर शाबासकी मिळायची आणि सोबत पगार झाल्यावर सायकल घेण्याच आश्वासन असायचं. पगार झाला कि कसा लगेच संपतो आता कळतंय पण तेव्हा बाबांचा पगार झाला म्हणजे आमचे सगळे बेत आखले जायचे. त्यामुळे सायकल मिळेपर्यंत सुट्टी संपायची आणि पुढच वर्ष चालू व्हायचं. पण आश्वासन पूर्ण व्हायचं नाही आणि परत तो त्या मृगजळामागचा पाठलाग सुरु व्हायचा.

          कॉलेज मध्ये गेल्यावर आयुष्य जरा नव्याने कळू लागल होत. आयुष्याच्या सीमा थोड्या का होईना पसरत होत्या.मनात एक प्रचंड उर्जा आणि करून दाखवण्याची जिद्द होती. शारीरिक बदलासोबत असे मानसिक बदल घडून येतात जे अत्यंत नाजूकपणे सांभाळणे गरजेचे असते .परिस्थिती आपण बदलू शकतो असा आत्मविश्वास असतो.प्रत्येक तरुण-तरुणी  हे त्यांच्या मनाचे राजे असतात. आत्मविश्वाच्या अश्वावर स्वार होऊन जग जिंकायचं असत.बाहेरच जग खुणावत असत.ह्यातच कॉलेजची  वर्ष निघून गेली आणि कॉलेज संपता संपता मात्र साऱ्यांना  नोकरीची किंवा पुढील शिक्षणाची चिंता लागलेली होती. आमच्यासारखे ज्यांनी नोकरी धारण पसंत केली त्याचा प्रवास सुरु झाला कॅम्पस मुलाखतीच्या वाटेवर .आणि मनात परत तेच खूप साऱ्या अपेक्षा ज्या नेहमीप्रमाणे कुठे ना कुठे कमी पडतात. ज्यांना चांगली नोकरी मिळते त्यांच्या पगाराच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि नाही मिळत त्यांच्या वाटेला.....पण  हे सारेजण मग  परत मृगजळामागे धावत राहतात  जे आता नाही मिळाल अजून पुढे जाऊन मिळेल ह्या आशेने...

         नोकरी सुरु झाली थोडेफार पैसे हातात आले आणि पैशाने सार काही विकत घेऊ शकतो असा उगाचच गैरसमज मनामध्ये घर करायला लागला. नोकरी नंतर दर वर्षी होणारी अप्रेझल्स , बढती ह्या मागे धावत राहिलो. वर्ष संपल कि अप्रेझल्सचे रेटिंग पाहून , बढती झालेल्यांची यादी पाहून परत मॅनेजरशी वादविवाद स्पर्धा होते. मॅनेजरच जिंकतो ह्या स्पर्धेमध्ये हा पण बक्षिशाच पुढील्या  वर्षाच आश्वासन आपल्याला  देऊन जातो. आपण मात्र उगीचच सार काही जिंकलो ह्या आविर्भावात वावरतो.परत मग प्रवास नवीन वर्षात नवीन आव्हानाचा आणि आपण दमलेलो असलो तरी धावत राहतो. परदेशवारी खुणावू लागली तस मग त्याच्या मागे प्रयत्न चालू होतात ते झाल की  हातात का माहित कितीही पैसे आले कमी वाटू लागली . मग कंपनी बदलली आणि तिथेही जाऊन तेच आभासी जीवनाचे चक्र सुरु झाले कधी न संपणारे...........

         आजकाल जेव्हा कधीही आयुष्याकडे तिऱ्हाईतासारख पाहतो तेव्हा मला हि कवितेचा गाभार्थ आठवत राहतो . लहानपणापासून आम्ही मृगजळामागे धावतच आहोत ते आजतागायत.धावून धावून दमलोय कि कंटाळलोय ह्यात फरक करण सुद्धा जमत नाही आहे.गरजा वाढत चालल्या आहेत कि अपेक्षा हे ठरवण अवघड जात आहे.इथे रणरणत वाळवंट नाही आणि तहानही नाही आहे. इथे आहे ती भूक न संपणारी ...ह्यातून बाहेर पडण थोडफार अवघड आहे पण अशक्य मात्र नाही. तयारी हवी आहे मनाची जग एकवटण्याची , जिद्द ह्यातून बाहेर पडण्याची. धावायचं म्हणजे किती दूर पर्यंत हे स्वतःच ठरवायचं आहे. सीमारेषा कर्तुत्वाच्या पसरायच्या आहेत गरजा नाहीत.

          काही दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठ सहकार्यांना भेटलो म्हटलं आता कि गृहकर्ज तर संपवलं तर मग आता अजून एक घर बघा तर त्यांनी शांतपणे दिलेलं उत्तर मला खूप भावलं "अरे घर म्हणजे तेव्हा माझी मुलभूत गरज होती आता घेतलं तर मग चैनीचा भाग होऊन जाईल . मला आता वेळ कुटुंबाला  द्यायचा आहे मुलीला लहानच मोठ होताना पाहायचं आहे . आजकाल जाऊन रविवारचे
मुलीच्या शाळेत वाचनाचे वर्ग घेतो.वेळ काढून गावी जाऊन वाडीतल्या मुलांना संगणक शिकवतो. लहान मुलांना शिकवताना खूप आनंद मिळतो रे ." सार काही ऐकताना वाटल इथे पळताना नव्हे तर थांबण्यासाठी शक्ती हवी आहे. मृगजळाचा पाठशिवणीचा खेळत जे अडकले आहेत अशा माझ्यासारख्यांची  मला त्या हरणापेक्षा खूप जास्त दया येते. फक्त ह्या मृगजळामागे धावताना थांबण्याची ती शक्ती आम्हास मिळु देत .....

Monday 21 January 2013

चाळ नावाची वाचाळ संस्कृती

         
          कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद  दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच  आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल  म्हणूनच ही  मत बनली असतील. तसचं  काहीस बाकी लोकांच  असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील . त्याबद्दल मला तरी कधी वाईट वाटल नाही उलटपक्षी चाळीतल जीवन त्यांना उलगडून सांगताना एक वेगळा आनंद मिळतो....

           लालबाग-परळ सारख्या ठिकाणी असणारी अनेकमजली चाळ किंवा उपनगरात वसलेल्या हजारो बैठ्या चाळी असोत, चाळ म्हणजे एकमेकाला लागून असलेली घरे आणि सर्वांनी वाटून घेतलेली common gallery. मी घरे म्हटले पण इथे सामान्यपणे वापरला जाणारा शब्द म्हणजे खोली होय. चाळीत सर्वात कमी गोष्ट म्हणजे इथे असणारी privacy कारण इथल्या घरांची दार सकाळपासून जी सताड उघडी असतात ती रात्री सरळ दहा वाजेपर्यंत अपवाद मात्र दुपारच्या अनेक साऱ्या गृहिणीची वामकुक्षीची वेळ असते . चाळीतल्या अनेक साऱ्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त बिऱ्हाड  राहत असतात.त्यामुळेच adjust करण हे भागच पडत. मी तर म्हणेन कि जसा अभिमन्यु युद्धाच शास्त्र त्याच्या आईच्या पोटातच शिकून आला होता तसच इथे जन्माला येणार प्रत्येक मुल हे adjust करण्याच बाळकडू शिकूनच आलेलं असत.कित्येक साऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला चाळीत adjust कराव लागत हे चाळीत राहिल्याशिवाय नाही समजणार आणि काही काही वेळा त्यात खूप आनंदही  मिळतो.आजकाल मी पाहिलं आहे की कित्येक साऱ्या   तरुणांची चाळीत राहण्यावरूनच लग्न रखडली आहेत. काही काही तरुण मुली मुलगा चाळीत राहतो ह्या कारणावरून नाक मुरडतात आणि मुलाचे शिक्षण, नोकरी इत्यादी गोष्टी चांगल्या असूनही नकार देतात.प्रत्येकच्या काही अपेक्षा असतात हे मी समजू शकतो पण आमच्या चाळींमध्ये जसे काही तोटे आहेत तसेच इथे प्रत्येक हाकेला धावून येणारी माणसेही आहेत.फक्त थोडीसी adjustment करावी लागतेच कारण चाळीत राहण्यासाठी हेच पहिले आवश्यक असत.

           लहानपणापासून जर घरी नावडती भाजी बनवली असेल तर शेजारच्या काकींकडे जाऊन त्यांच्याकडे बनवलेली भाजी घेऊन यायचो.जे मी अजूनही करतो .पण आजकाल साऱ्या भाज्या आवडू लागल्या हा भाग थोडासा वेगळाच आहे. दरवर्षी दिवाळीच्या पहिल्यादिवशी  आपल्या घरातला फराळ संपूर्ण चाळीत वाटून यायचा ह्याची आम्हा साऱ्या लहान मुलांमध्ये जणू काही स्पर्धाच  लागायची.मला  अजूनही आठवत आहे काही वर्षापूर्वी घरातील सर्वजण गावी गेले होते माझ बारावीच वर्ष क्लासेस चालू असल्या कारणाने मला जाता आल नाही. वडलांनी बाहेर जेवणाकरता थोडे फार पैसे देऊन ठेवले होते.पण त्या आठ दिवसामध्ये मला एकही दिवस मला बाहेर जेवावे लागेल नाही कारण त्या आठ दिवसांची माझी जेवणाची सारी जबाबदारी आमच्या चाळीतल्या साऱ्या काकींनी वाटून घेतली होती.चाळीतल कोणी गावावरून आलाच कि फणसाचे गरे ,आंबे ,शेंगदाण्याचे लाडू इत्यादी सार आपल्या घरी कधी आणून देतात ह्याची आतुरतेने वाट पाहतात.काहीना थोडासा हावरेपणा वाटेल हा पण आम्ही चाळकरी हक्काने सार  काही वाटून घेणारे मग ते सुख असू देत किंवा दुखहि असू देत. चाळीत सारे काही असे सुखाने नांदतात अस नाही तर काही क्षुल्लक कारणावरून भांडतील आणि एकमेकांच्या मागच्या पिढीचा उद्धारही करतील.मात्र जेव्हा कधी गरज असते तेव्हा हीच माणस सार काही विसरून पहिले धावून येतील.

          चाळीमध्ये आजही सालाबादप्रमाणे  होळी,गणेशोत्सव आणि सत्यनारायणाची पूजा हे खूप धुमधामामध्ये साजरे केले जातात.काही दिवसापूर्वी मी भारतात येउन गेलो तेव्हा आमच्या चाळीत सत्यनारायणाच्या पूजेची तारीख ठरली. तसा एक महिन्याचा अवकाश होता पण तिथल्या चिल्लर पार्टीमध्ये जो काही उत्साह  होता तो तर एकदम वाखाणण्याजोगा होता. कारण स्वतच्या अंगातील कला लोकांपुढे सदर करण्याच एक हक्काच अस व्यासपीठ त्यांना पूजेच्या करमुणकीच्या कार्यक्रमांमधून मिळत असत. महाराष्ट्रातील अनेक सारे कलावंत असाच साऱ्या प्रोत्साहनाने पुढे आले आहेत. कधीही कुठेही तुमच कौतुक होऊ देत पण घरच्या आपल्या माणसांकडून मिळालेली कौतुकाची थाप हि खूप जास्त महत्वाची वाटते.आमच्या चाळीतील अनेकांच्या मध्यमवर्गीय प्रवासाने त्यांना आज चांगली आर्थिक  सुबत्ता दिली.चाळीची लागलेली सवय मात्र ह्या चाळीतील रहिवाशांना एकमेकांपासून दूर घेऊन जात नाही .

          काळानुसार आमच्या चाळीसुद्धा आजकाल बदलू लागल्या आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली इथे मोठे मोठे tower उभे राहत आहेत. त्याकरता बिल्डरांकडून खेळल्या  जाणाऱ्या राजकारणामुळे
इथल वातावरण ढवळून निघत आहे. सारी काही  समीकरण बदलत आहे .काही पैशांच्या लोभापायी माणस दुरावली जात आहेत. उद्या भविष्यात अशा हजारो चाळी पुनर्विकासाच्या नावाखाली पडून त्या जागी tower दिसतील पण  "चाळ नावाची वाचाळ संस्कृती" प्रत्येकाच्या मनात घर करून राहू देत हेच नेहमी वाटत आहे.